गुरुवार, २२ जानेवारी, २०१५

मोक्ष म्हणजे काय ??



ब्रह्म म्हणजे काय, आनंदस्थिती म्हणजे काय,         
 मोक्ष म्हणजे काय याचे वर्णन करून सर्व
शास्त्रे, सर्व वेद, उपनिषदे, पुराणे थकली.
या सर्व शास्त्रांनुसार जीव उपासना करतो,
तपश्चर्या करतो; पण प्रत्यक्षात ती स्थिती,
त्याचे ज्ञान व्हायची वेळ येते तेव्हां जीव
अवस्थेतून शिव व्हायला तयार
होणारा कोणी विरळाच असतो.
पाण्याच्या निरनिराळ्या अवस्था -
ग्लासाचा आकार घेतलेले पाणी, टाकीचा आकार
घेतलेले पाणी, आप, वाफ, ढग, बर्फ, पाऊस,
ओहळ, नदी, तलाव, या सर्व
पाण्याच्या निरनिराळ्या एकापेक्षा एक उन्नत
अशा अवस्था आहेत.
अगदी जीवाच्या प्रवासाप्रमाणे. पाणीदेखील
शेवटी अगदी उच्चतम अवस्था, म्हणजे
महासागर बनून तिथे स्थिरावते. तत्वद्
जीवदेखील हिरण्यगर्भ स्थितीला पोचून
आनंदाची परिसीमा गाठली,
मोक्षप्राप्ती झाली असे समजून सुखावतो.
तिथे जीव ब्रह्मज्ञानी झाला. (ब्रह्म
नाही झाला). अशा उच्चतम
अवस्थेला पोहोचल्यावरही आपले अस्तित्व,
आपले वेगळेपण, म्हणजे आपला 'मी' भाव
सोडणे केवळ अशक्य. म्हणून मी वर म्हटले
आहे जीवाचा शिव झाला तो विरळाच. कारण
महासागर झालावरही त्याला इतर जीवांची,
त्यांच्या अज्ञानाविषयी करुणा,
त्यांना आनंदस्थिती,
मोक्षप्राप्ती व्हावी ही तळमळ असते.
कितीतरी महात्मे या स्थितीला येऊन थांबतात.
मला ’अमृतानुभव' वाचल्यावर जे समजले, जे
जाणवले ते त्याही पलिकडचे आहे. पाण्याचे
उदाहरण घेऊन सांगायचा प्रयत्न करतो.
त्या पलिकडची अवस्था म्हणजे जलतत्त्व.
त्या तत्त्वात जीव सहसा विलीन होत नाही.
कारण अस्तित्वहीन अशी ती अवस्था आहे.
'काही न होणे' अशी ती अवस्था. कारण
त्याला थेंब, वाफ, बर्फ, झरा, तलाव
या उपाधींसंबंधी काहीच माहीत नसते. माहित
झाली तर अद्वैतस्थिती सांडून उपाधीयुक्त
द्वैत स्थिती झाली. द्वैत म्हणजे जीव - मग
त्याला संसार, सुखदुःखे आलीच. पाण्याला जर
मनुष्य म्हणेल, भगवन् पाणीदेवा, तू जेव्हां सागर
बनून छोट्या छोट्या लाटा निर्माण करतोस
तेव्हां खूप मजा वाटते. पण भयंकर
मोठा सुनामी बनतोस तेव्हां भारच भयंकर
असतोस. तेव्हां पाणी काहीच बोलू शकत नाही.
बोललेच तर म्हणेल, सागर म्हणजे काय, लाट
म्हणजे काय, सुनामी म्हणजे काय, मजा वाटते
म्हणजे काय, भयंकर असतोस म्हणजे काय -
त्याला काहीच समजत नाही. म्हणून वाटते
की सर्व संत, सर्व ऋषि, मुनि, योगी, आचार्य,
गुरू, सर्वच हिरण्यगर्भ अवस्थेपर्यंत जातात,
कारण तिथेही 'अहं ब्रह्मास्मि' हा भाव राहतोच.
पण विलीन झालेला कोणी विरळाच. त्याला 'अहं
ब्रह्मास्मि' हेही स्फुरण नसतेच.