गुरुवार, १९ मार्च, २०१५

निश्चयाने सारं काही बदलून जातं!

निश्चयाने सारं काही बदलून जातं!
माणसाच्या इच्छांना मर्यादा नसते, पण त्यापैकी कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याला मात्र निश्चितच मर्यादा असते. या मर्यादा येतात त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी आपण किती प्रयत्न करतो किंवा करीत नाही यामुळे. इच्छाकांक्षेपासून इच्छापूर्तीपर्यंतचा हा प्रवास तीन टप्प्यांचा असतो.
* पहिला टप्पा असतो एखाद्या गोष्टीची इच्छा धरणे.
*
दुसरा टप्पा असतो ती इच्छा घडून येण्यासाठी तसा निर्णय करणे आणि,
*
तिसरा टप्पा म्हणजे हा निर्णय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी दृढनिश्चय करणे.
पहिला टप्पा पार करणे फार सोपे असते. ज्याला इच्छा नाहीत असा माणूस विरळाच. त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून निर्णय करणारेही अनेक लोक असतात, पण हा निर्णय खरा करण्यासाठी दृढ निश्चयाने झगडणारे मात्र कमी लोक असतात. आणि ज्या प्रमाणात निश्चयाचं बळ असतं त्याच प्रमाणात त्यांच्या इच्छा पूर्ण होत असतात.
निश्चय करणं म्हणजे स्वत:शी एक प्रतिज्ञा करणं. या प्रतिज्ञेमुळे तुमच्यावर ती इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी येऊन पडते. आणि जेव्हा जबाबदारी येते तेव्हा आपण थोडे गंभीर होऊन या सगळ्या प्रकाराकडे बघायला सुरुवात करतो. कारण आता इतर कोणी आपल्याला बोलो बोलो आपलं मन सतत आपल्याला बोलत असतं, टोचत असतं.
आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हात, पाय, डोके हलवणं भाग पाडतं. निश्चयाची गरजच मुळात का भासावी, असा एक प्रश्न इथे पडू शकतो. आपण जशी सामान्य, सहजपणे होणा-या गोष्टींची स्वप्नं बघत नाहीत, तसंच शक्य गोष्टींबाबतही आपण कधी निश्चय करत नाहीत. त्यामुळे या निश्चयांना आपोआपच एक गांभीर्य लाभत असतो, पण या निश्चयालाही थोड्या आधाराची, बळाची गरज असते. त्यासाठी काही उपाय असे.
* तुम्ही जो निश्चय कराल तो लिहून ठेवा.
*
तुमच्या ओळखीतील जास्तीत जास्त लोकांना त्याबद्दल सांगा.
*
दर दिवशी तुमच्या इच्छेसाठी तुम्ही काही तरी करा आणि त्याचा आढावा घ्या.
*
सुरुवातीलाच यश-अपयशाचा विचार करणं सोडून फक्त गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करा.
कोणत्याही लिखित गोष्टींमुळे एक पुरावा निर्माण होतो. हा पुरावा तुम्ही तुमचा वर्तमान आणि भविष्य चांगलं व्हावं यासाठी केलेला एक लिखित करारच असतो. जेव्हा तुम्ही त्याबाबत अनेकांना सांगता तेव्हा दरवेळी तुम्ही स्वत:लाही सांगत असता आणि त्याचवेळी ती माणसंही तुम्हाला वेळोवेळी त्याबाबत विचारून तुम्हाला त्याची आठवण करून देत असतात.
त्यामुळे तुम्हाला त्याचा विसर पडत नाही आणि तुम्ही त्यासाठी काही ना काही धडपड करू लागता. या गोष्टी कितीही लहान असोत त्या शेवटी तुमच्या इच्छापूर्तीची इमारत उभारण्यात विटांची भूमिका करतात. सुरुवातीलाच तुमची इच्छा पूर्ण होईल की नाही याचा विचार करणं सोडून द्या आणि फक्त हाताशी असलेल्या लहान गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा.
तुमचा निश्चय अशा पद्धतीनं कायम राहील तेव्हाच तुमची इच्छापूर्ती होऊ शकेल.
शिवाजी महाराजांच्या बाबतीत संत रामदासांनी लिहून ठेवलंय,
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी।
त्यातील तात्पर्य हेच आहे की ज्याच्या अंगी निश्चयाचे बळ असते तो स्वत:लाच नाही तर इतरांनाही त्यांच्या इच्छापूर्तीसाठी आधार ठरू शकतो.
Sources : Unknown / कुठेतरी छानसे वाचलेले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा