शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच खरा उपयोगी पडतो.



संताजवळ आसक्ति जरी पुरती सुटली नाही तरी नकळत
कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्समागमात असावे.
संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार
चांगला परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच
कुणाला मारावेसे वाटेल; ही झाली काठीची संगत. आपण
हातात माळ घेतली तर त्याने जपच करू, माळेने काही आपण
कुणाला मारणार नाही. आपल्या पोषाखात, वागण्यात,
बोलण्यात, सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते;
म्हणून संताचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासरामागून
येते, तसे संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम
घेणाऱ्याला धुंडाळीत येतील, आणि त्यांच्या मागोमाग भगवंत
अर्थात् आलाच म्हणून समजा. दवाखान्यात
गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो, तसे आपण
संताच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून
संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले, असे
मानले पाहिजे. सत्संगतीने साधकाची वाढ होते.
संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन
नाही. संतांना भक्तिचे व्यसन असते. ते नेहमी नामात
असतात. संत हे भगवंतावाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत;
म्हणून ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. भगवंताचे नाम
सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार
होय. प्रापंचिक
लोकांना परमार्थाला लावावयाला संसारी संतच
खरा उपयोगी पडतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा