रविवार, ९ नोव्हेंबर, २०१४

बिया फेकणारा माणूस ........


बिया फेकणारा माणूस
------------------
गोष्ट आहे सीताफळांच्या बिया साठवणाऱ्या एका वयस्कर माणसाची. अकलूज गावचा हा माणूस गेली ३० ते३५ वर्षे सीताफळांच्या बिया साठवतो. मुंबईला, पुण्याला कामानिमित्त जावं लागतं. तो पिशवी भरून त्याघेतो आणि जाताना घाटात गाडी थांबते तिथं तिथं दरीत फेकून देतो. हल्ली त्या घाटावर पाट्यांमध्ये पिकलेली सीताफळं घेऊन अनेकजण विक्रीला बसलेले असतात . अलीकडे या माणसानं खास त्यांच्याकडे जाऊन विचारलं , ' कुठून आणता ही सीताफळं ?' ' तुमचे मळे आहेत का ?' ' कुठले मळे साहेब ? आम्ही गरीब माणसं . लोक घाटात शेकड्यानं बिया टाकतात . झाडं उगवलीत दरीत . सारं फुकटच . आम्ही फळं गोळा करतो . पिकवतो आणि तुम्हाला विकतो . शेकडो गरीब कुटुंब चालतात यावर इकडची .' त्या विक्रेत्याकडं गहिवरल्या डोळ्यानं पहात हीव्यक्ती डझनभर सीताफळं विकत घेते . पुन्हा बिया गोळा करून घाटात फेकण्यासाठी ! बारमाही काम करतायेईल असा हा देश . बिया फेकल्या तरी अमृतासमान चव असणारी फळे पिकवणारी इथली माती . बिया साठवूनएखादा जरी घाटावरून त्या दरीमध्ये फेकणारा भेटला तरी हजारो कुटुंबांची तो सोय करून जातो .
वर वर किरकोळ वाटली तरी ही घटना अंतर्मुख करते . ही दृष्टी किती लोकांची असते ? जर प्रत्येकानं असा एखादा छंद बाळगला तर काळ बदलून जाईल . अशा माणसांना काय व्यक्तिगत दुःख असत नाही , असं नाही . तोही पिंजून गेलेला असतो . पण अशा प्रेरणा तो दाबत नाही . तो त्या कृतीत आणतो .आपल्याला आपलं अंतर्मन कित्येकदा एखादं सत्कृत्य करायला सांगत असतं ; पण कितीवेळा आपण ते करतो ?एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला काही तरी दान करावं म्हणून खिशात गेलेला हात कित्येकदा तसाच बाहेर येतो .
सरहद्दीवर विनाकारण गोळीबार करणारे शेजारी देश शहरा - शहरात स्फोट घडविणारे अतिरेकी , देशात राहूनदेशद्रोह करणारे काहीजण आणि अशा अनेक उलट्या काळजाच्या व्यक्तींच्या समूहामध्ये उद्विग्न झालेले आपणसारे . आपल्याला बिया फेकणारी अशी एखादी व्यक्ती भेटली , तर शहारून जातो आपण . मनाला कुणीतरी गारफुंकर मारून सुखावतंय असं वाटतं .
जंगलाची तोड होते . रस्त्यासाठी , इमारतीसाठी झाडांची तोड होते . तितक्या प्रमाणात ती पुन्हा लावली जातातका ? तोडलेल्या झाडांवरच्या पक्ष्यांचं पुढं काय होतं ? याचाही विचार नको का करायला ? झाडांशिवाय आणिपक्ष्यांशिवाय असलेलं गाव ते गाव कसलं ? ग्लोबल वॉर्मिंगच्या जागतिक परिषदा होत राहतात . मीडियातूनत्यांचा उदो उदो होतो . त्यातून साध्य काय होतं ? झाडं लावणारे , ती जगवणारे , पक्ष्यांना दाणे टाकणारे ,झाडांवरच्या घरट्यांकडं भरल्या डोळ्यांनी बघणारे आणि सीताफळांच्या बिया फेकणारे शेवटी पडद्याआडचराहतात .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा